६ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’ - भाग २



भाग २

या निशब्द शांततेत माझ मन पाहाता पाहाता १८  -२० वर्ष मागे गेल. त्या वेळी आम्ही नुकतेच या बिल्डींगमध्ये राहायला आलो होतो. आजुबाजुच्या सर्वांशी हळुहळु ओळखी होत होत्या. माझी नोकरी नविन असल्याने संध्याकाळी येण्यास उशिर मला होत होत असे. असाच एके दिवशी उशिरा घरी येत असताना एका पोराने मला सायकलने धडक दिल्याने आमची बाचाबाची झाली. तो पोरगा त्या गल्लीतलाच असल्याने लगेचच त्याचे चार-पाच मित्र तिथे जमा झाले.त्यामुळॆ त्या मुलाची चुक असुनही मलाच तडी पडण्याचे ब्राईट चान्सेस होते. तेवढ्यात तो आला. त्याने मला विचारलं, "काय रे,काय झाल." 
मी वैतागुन त्या अगंतुकाकडे बघितल . तो हसला आणि म्हणाला,"काय रे माझ्या बिल्डींग मध्ये राहातोस आणि मला ओळखत नाहीस." दुसरी कुठची वेळ असती तर मी ह्या टिकोजीरावाला पण उलटा बोललो असतो पण मारामारीच्या विषम परिस्थीतीत त्याने दाखवलेल्या या ओळखीचा मोठाच आधार वाटला . मग मी त्याला जे घडल ते सर्व सांगीतलं. त्याने सर्व ऎकुन घेतलं आणि म्हणाला," निघ तु,मी बघतो काय ते."
मग काय मी सरळ कन्नी कापली . घरी आल्यावर मात्र त्याला एकट सोडुन निघुन आल्याची रुखरुख मनात रात्रभर राहीली. दोन दिवसांनी रविवार उजाडला. सुट्टीचा दिवस असल्याने मी चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो तर माझ्या पेक्षा ८-९ वर्षांनी मोठा असेलला एकजण बिल्डींगच्या मेनगेट्वर पाठमोरा बसलेला दिसला. गेटच्या बाहेर पडता पडता एक ओझरती नजर त्याच्यावर टाकली.’त्याची उंची साधारण पावणॆ सहा फुट आणि बिल्ट एखाद्या बॉडीबिल्डर सारखी हॊती. दिसायला स्मार्ट जास्त नाही पण तरीही एकंदर व्यक्तीमत्व लक्षात राहाण्या सारखं. तेव्हड्यात त्याचच लक्ष माझ्याकडे गेलं. तो माझ्याकडे पाहुन हसला आणि म्हणाला" काय भाई, आम्हाला विसरलात वाटत."
हे वाक्य ऐकल्यावर मात्र मी चमकुन त्याच्याकडे नीट पाहीलं .  मग लक्षात आलं अरे हा तोच की,परवा माझी मार खाण्या पासुन सुटका करणारा. काहीसं ओशाळुन मी त्या संकटमोचनला म्हणालो," सॉरी.पटकन तुम्हाला ओळखलच नाही."
" साल्या तुम्हाला म्हणून शिव्या कशाला घालतोस.तुला म्हण मित्रा
मग त्यानेच हात पुढे केला .त्याच्याशी हात मिळवल्यावर त्याच्या अंगातली ताकद मलाही जाणवली. त्यानेच स्वत:ची आणि माझी ओळख करुन घेतली. त्या पहिल्याच भेटीत आमच्या आवडीनिवडी बर्‍याचश्या समान असल्याचं कळलं. त्याच्याशी बोलता बोलता दोन-अडीच तास कसे गेले तेच कळल नाही. त्या अडीच तासात त्याने बिल्डींग मधल्या जाणार्‍या प्रत्येक मुलाशी माझी ओळख करुन दिली. त्यातुन जाणवलं की बिल्डींग मधला प्रत्येक मुलगा त्याला किती रिस्पेक्ट देतो ते.जसे जसे दिवस गेले तसे तसे माझ्याही मनातला त्याच्या बद्दलचा रिस्पेक्ट वाढतच गेला. खरंतर त्याच्या माझ्या वयात चांगल ८-९ वर्षांच अंतर होत पण काही दिवसातच आम्हा दोघांमधली मैत्री इतरांपेक्षा जास्तच वाढत गेली. त्याच्या सगळ्यांना मदत करायच्या वृत्तीमुळे बिल्डींग मधल्या मोठया माणसांना सुध्दा त्याचं कौतुक असायच.असा हा आमचा हा संकटमोचनमित्र, सत्त्याच्या जन्मानंतर मात्र फारच बदलला होता.त्याच्या तोंडात आता सारख सत्त्याचंच नाव असायचं......
मी असा जुन्या आठवणीत रमलो असतानाच सत्त्याचे आबा तिथे आले .वहिनी पण नोकरी करत असल्याने सत्त्याची लहानपणीची देखभाल त्यांनीच केली होती.आबा आणि सत्त्या ही जोडगोळी आमच्या परिसरातल्या सगळ्यांनाच परिचीत होती. आबा देखिल मला त्यांच्या घरचाच मानत असल्याने माझ्याच जवळ येवुन बसले. त्यांचा बापुडवाणा चेहरा पाहुन माझ टेन्शन जास्तच वाढलं. त्यांच्या कडुन पुढे जे कळलं त्यानं मला धक्काच बसला.
" अरे,सत्त्याने विषारी औषध प्यायल असं सगळे म्हणतात रे."
त्यांचा स्वर रडका आणि त्या पेक्षाही जास्त दुखावलेला वाटला.
"नाही आबा, सत्त्या असं कसं करेल. किती शांत आणि मनमिळावू स्वभाव आहे त्याचा."
"होना. मला तेच वाटतं.चुकुन काहीतरी बाहेरचं खाण्यातं आलं असेल रे पोराच्या."
"होना फुड पॉयझनच असेल. दुसरं काय?"
"अरे हळवं आहे पोर.कधी कोणाशी वाद नाही की भांडण."
"जावु दे ना आबा, लोक काहीही बोलतातं झालं."
"त्यात सुनबाई आणि हाकाहीही स्पष्ट सांगत नाहीत."
मी यावर काही बोलणार तोच आबा म्हणाल," किती जपलं या पोराला लहानपणा पासुन. पण शेवटी व्हायच ते झालचं."
या पुढे त्यांच्याशी काय बोलावं ते मला सुचेनाच . त्यात संध्याकाळी घरी आल्या पासुन एका पाठोपाठ बसलेल्या या धक्क्यांनी मी सुन्नच झालं होतो. त्यात हाअबोल तर वहिनी धावपळीत त्यामुळे नक्की काही कळायला मार्गच नव्हता.
तेव्हड्यात वहिनी मला म्हणाल्या ," अरे आबांना आता घरी घेवुन जा. तुमच्या कडेच ते जेवतील. मिनाला मी सांगितल आहे."
"आणि तुमच्या जेवायचं काय?"
"तुझी बायको मघाशीच बजावुन गेली आहे डबा पाठवते म्हणुन..."
"ठीक आहे. मी आठ पर्यंत डबा घेवुन येतो." 
"तु सावकाश साडे नऊ पर्यंत ये. तुला याच्या बरोबर आज रात्री थांबाव लागेल त्या मुळे त्या तयारीनं ये."
"आता..."
"निघ. कारण आता माणसं आहेत. रात्रीच तुझी गरज आहे."
पण आबा निघायला तयारच नव्हते.मी आणि वहिनींनी कस बसं त्यांना समजावल आणि त्यांना घेवुन घरी आलो.




 


 


 


 




 

 

 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: